Byju’s Crisis : पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून Byju’s च्या मालकाने गहाण ठेवलंय घर

Byju’s Crisis: या बदलत्या ऑनलाईन जगात शिक्षण घेण्याच्या पद्धती देखील इंटरनेटच्या सहाय्याने पूर्ण केल्या जातात. अगदी पहिलीतल्या वर्गापासून ते थेट पदवीउत्तर शिक्षणापर्यंतची मदत इंटरनेटच्या सहाय्याने पोहोचवली जाते. काही वर्षांपूर्वी जे शिक्षक एका वर्गातील मुलांना, एकाच वेळी अभ्यासाचे धडे द्यायचे त्या जागी आता इंटरनेट हे माध्यम बनलेलं आहे. विद्यार्थ्यापासून कैक दूर असणारे शिक्षक अगदी सहजरीत्या त्यांना शिकवतात, किंवा त्यांचे प्रश्न सोडवतात. या क्षेत्रात Vedantu, Byjus, Unacademy यांसारखी नावं प्रसिध्द आहेत. पैकी Byju’s या शैक्षणिक संस्थेबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

Byju’sच्या मालकाने संपत्ती ठेवली गहाण:

प्रसिद्ध ऑनलाईन शैक्षणिक संस्था म्हणजे Byju’s, ही सध्या अनेक मोठाल्या संकटांचा (Byju’s Crisis) सामना करत आहे. अशी आर्थिक संकटं कदाचित आपल्या विचारांच्याही पलीकडली असावीत कारण कंपनीचे मालक Byju Raveendran यांनी स्वतःचे राहते घर गहाण ठेवून पैश्यांची जमवाजमव केली आहे, एवढच नाही तर यांनी परिवारातील इतर सदस्यांची संपत्ती आणि मालमत्ता देखील गहाण ठेवली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि एवढा नावलौकिक मिळवलेली कंपनी पैश्यांची जमवाजमव कश्यासाठी करत आहे? गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीच्या कर्मचारी वर्गाला त्यांचा पगार मिळालेला नाही. आणि पगाराची रक्कम त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचावी म्हणून बायजू रविंद्रन यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आहे.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार बायजू यांनी गहाण ठेवलेल्या संपत्तीमधून त्यांना 12 मिलियन डॉलर्स एवढी मोठी रक्कम उधारी म्हणून देण्यात आली आहे (Byju’s Crisis). या संपत्तीमध्ये दोन अलिशान घरं, एप्सीलोऊन यांचा समावेश होतो. यानंतर मूळ कंपनी थिंक एंड लर्न कडून 15,000 कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देण्यात आला होता. हि सर्व माहिती सूत्रांनी गोळा केलेली असून अद्याप स्वतः बायजू रविंद्रन किंवा कंपनीच्या इतर सदस्यांनी समोर येत कोणतीही माहिती दिलेली नाही.

कंपनी संकटात का आहे? (Byju’s Crisis)

असं म्हणतात कि सध्या बायजू हि कंपनी 400 मिलियन डॉलरना विकली जाण्याची शक्यता आहे. सध्या हि कंपनी 1.2 अरब डॉलर टर्म लोनच्या एका कचाट्यात अडकलेली आहे. बायजू रविंद्रन हे सध्या मोठ्या आर्थिक संकातून मार्ग काढत असून त्यांनी स्वतः 400 मिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. हि संकटांची शृंखला इथेच थांबत नाही कारण काही दिवसांआधी कंपनी आणि बायजू रविंद्रन यांना ED कडून 9,362.35 कोटी रुपयांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती, तसेच BCCI सोबत करार झाल्यानंतर काही दिवसांतच BCCI आणि कंपनी यांच्यातही ठिणग्या उडत होत्या.