Indian Economy : ग्रामीण भागातील मजबूत परिस्थतीमुळे येणार देशाच्या अर्थव्यवस्थेत तेजी; जागतिक फर्म नोमुराचा अंदाज

Indian Economy: गेल्या वर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेने सर्वोत्तम कामगिरी करत यशाचा पल्ला गाठला. आपण देशांतर्गत सुरू केलेली Vocal For Local ही मोहीम अर्थव्यवस्थेला आधार देत आहे. भारतात दिवसेंदिवस घडणारे हे सकारात्मक बदल पाहता जगभरातील अनेक तज्ञ आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था नवनवीन शिखरं गाठेल अशी शक्यता वर्तवत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का भारताच्या अर्थव्यवस्थेला केवळ शहरातूनच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळू शकतो. जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारताच्या अर्थव्यवस्थेत तेजी येण्यासाठी शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागाचा देखील अनमोल वाटा ठरू शकतो. गाव म्हटलं की या मागासलेल्या क्षेत्रातून उत्पन्नाची शक्यता क्वचितच असेल अशी सर्वसाधारण विचारसरणी बाळगली जाते. तसेच ग्रामीण भागामध्ये प्रगती करण्याची साधने उपलब्ध नसल्याने अनेक तरुण शहराकडे वळताना दिसतात. अशा परिस्थितीत नोमुराचे वक्तव्य उलगडून पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ग्रामीण भाग करणार भारतीय अर्थव्यवस्थेला मदत:(Indian Economy)

भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चाललेल्या आवाहनांना न जुमानता झपाट्याने वाढत आहे. जगात सध्या विविध युद्ध सुरू आहेत तसेच ताणतणावाची स्थिती कायम बनलेली आहे. अशा गंभीर परिस्थितीतही भारतासारखा विकसनशील देश वेगवान कामगिरी करत असल्याने अनेकांकडून याचं कौतुक केलं जातंय .जागतिक गुंतवणूक बँकिंग फर्म नोमुराने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला गावातून देखील मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला विधानाला आधार म्हणून नोमुरा म्हणते की महागाईचा वेग हा सध्या मंदावत आहे व यामुळे बाजारातील मागणी वाढू शकते.

नवीन वर्षात भारतातील गावांमधून देखील मागणी वाढण्याची त्यांना अपेक्षा आहे. असे का? यावर पटण्याजोगी उत्तरं व्यक्त नोमुरा सांगते की, कोविडच्या महामारीनंतर ग्रामीण भागातील बचत ही संपुष्टात आली होती, मात्र हळूहळू आता ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत आहे. तसेच भारतात सुरू असलेल्या निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात खर्च केलेला पैसा अर्थव्यवस्थेला (Indian Economy) मदत करू शकतो. नोमुराने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांतच बाजारातील स्थिती खूप मजबूत होणार आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांनी वाढू शकते. चालू आर्थिक वर्षात नमूराच्या अंदाजाप्रमाणे महागाईचा दर हा 5.6 टक्के असू शकतो, व आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तो 4.5 टक्क्यांपर्यंत पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. देशात सुरू असलेले निवडणुकीचे वातावरण गावाच्या परिस्थितीला पोषक ठरणार असून सरकार ग्रामीण उपभोगांना आधार देऊ शकते.

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अजून एक मोठा घटक म्हणजे ग्रामीण वेतन होय. भारताच्या गावांमध्ये मिळणारं हे वेतन महागाई पेक्षा अधिक आहे. म्हणजेच गावातील लोकं ही महागाईच्या आकड्यांपेक्षा अधिक पैसा कमावत आहेत. या सर्व घटकांच्या आधारे जर का ग्रामीण भागातून बाजारातील खप वाढला तर यामुळे भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) सुधारू शकते. गेल्या वर्षभराचे आकडे पाहता सध्या ग्रामीण भागात सुधारणा होत आहे व याच्या परिणामी भारताच्या अर्थव्यवस्थेला भरपूर फायदा होऊ शकतो.