Paytm Crisis: Paytm ने ठोठावला अर्थमंत्रालयाचा दरवाजा; सीतारामन करतील का कंपनीची पाठराखण?

Paytm Crisis: फिनटेक कंपनी Paytm वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे केलेल्या कारवाईनंतर कंपनीवरील संकट अधिक गडद होत चालले आहे. RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली असल्याने कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी Paytmचे CEO विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि RBI च्या कारवाईबाबत आपली बाजू मांडली. वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाने Paytm ला हे प्रकरण RBI सोबतच सोडवण्याचा सल्ला दिला आहे.

Paytmची नेमकी मागणी काय? (Paytm Crisis)

Paytm चे CEO विजय शेखर शर्मा यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईवर आपली भूमिका मांडली. यापूर्वी एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अंमलबजावणी संचालनालय (ED) मध्यवर्ती बँकेने उपस्थित केलेल्या प्रमुख मुद्द्यांवर औपचारिक चौकशी सुरू करू शकते. पण Paytm ने याआधीच ईडीच्या कोणत्याही प्रकारच्या तपासाला उत्तर द्यायला नकार दिला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्यापूर्वी Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही RBI अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. ते म्हणाले की Paytm वर केलेल्या कारवाईचा(Paytm Crisis) येणाऱ्या काळात विपरीत परिणाम होईल, ज्यामुळे काही इतर स्टार्टअपवरही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. वृत्तानुसार, या बैठकीत त्यांनी सेंट्रल बँकेला (RBI) पेटीएम पेमेंट बँकेवरील बंदीचा आदेश वाढवण्याची विनंती केली आहे. 29 फेब्रुवारी 2024 ची अंतिम मुदत वाढवण्याची आणि RBI ने नमूद केलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.