Ram Mandir Inauguration : श्रीराम मंदिरामुळे देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय; भक्तांचा उत्साह करणार बाजाराची भरभराट

Ram Mandir Inauguration : सध्या आपल्या देशात निर्माण होणाऱ्या राम मंदिराबद्दल अधिकाधिक चर्चा केली जात असून, प्रत्येकाच्या मनात राम मंदिराबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीरामांच्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल व म्हणूनच सध्या संपूर्ण देशात जोरदार तयारीचे वातावरण दिसून येते. राम मंदिर निर्माणमुळेच आता देशभरात अधिकाधिक व्यवसाय उत्पन्न होण्याचा अंदाज Confederation Of All India Traders नी व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मते राम मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या व्यवसाय 50 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता वर्तवली गेली होती, पण आता त्यांनी हा आकडा वाढवून 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली आहे.

देशात वाढणार श्रीरामांमुळे व्यवसाय: (Ram Mandir Inauguration)

अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिरामुळे दिल्ली ते गल्ली सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येकालाच काही ना काही तरी व्यवसाय सुरु करण्याची इच्छा निर्माण होत आहे. देशभरातील जनतेचा हाच उत्साह पाहून कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स नी आपल्या अंदाजात बदल घडवले. या संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी देशातील व्यवसायांच्या बाबतीत ही एक दुर्मिळ घटना घडत असल्याचे वक्तव्य केले, व याला घडामोडीला ऐतिहासिक घटनेचे नाव दिले. पुढे खंडेलवाल असेही म्हणतात की, राम मंदिराप्रती व्यापारी आणि इतर वर्गाचे प्रेम आणि समर्पण यामुळेच देशभरातील व्यापारी संघटनांकडून 30 हजार पेक्षा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये शोभायात्रा, श्रीराम परेड यात्रा, श्रीराम रॅली, श्रीराम फेरी, स्कूटर आणि कार रॅली इत्यादी अनेक कार्यक्रमांचा समावेश होतो. शिवाय भारतीय बाजारात सध्या श्रीरामांचे झेंडे, टोप्या, टी-शर्ट, श्रीरामांची आकृती छापलेले कुर्ते अशा अनेक घटकांची जोमाने मागणी वाढली आहे.

श्रीराम मंदिरामुळे सध्या मंदिराच्या मॉडेलची मागणी देखील वाढत आहे, हे मॉडेल तयार करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये अहोरात्र काम सुरू आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात संगीत समूह, ढोल-ताशा बँड, शहनाई इत्यादी वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांचे येत्या काही दिवसांसाठी बुकिंग करण्यात आल्याने केवळ देशभरातील कारागिरांना नाही तर अनेक कलाकार मंडळींना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. अयोध्येत निर्माण होणाऱ्या श्रीरामांचा उत्सव(Ram Mandir Inauguration) हा काही दिवाळीपेक्षा कमी नाही, म्हणूनच देशभरातून बाजारपेठांमध्ये सध्या रंगबिरंगी दिवे आणि फुलांची सजावट इत्यादी सामानांची भरघोस प्रमाणात विक्री केली जात आहे. एवढेच नाही तर भंडारा आणि इतर आयोजन वस्तू आणि सेवांची मागणी वाढली असून हे व्यवसाय 1 लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.