Smartphones In India : भारताने केलाय नवीन विक्रम; 99.2% Made In India स्मार्टफोन्सची विक्री

Smartphones In India : सध्या भारतात आपण जास्तीत जास्त गोष्टी स्वतः तयार करण्यावर केंद्रित केलेलं आहे, मोदी सरकारने या मोहिमेला मेक इन इंडिया (Make In India) असं नाव दिलेलं आहे. किंवा अनेक वेळा आपण वोकल फोर लोकल(Vocal For Local) या नावाखाली आपण आजूबाजूला असलेल्या दुकानदारांचा खप वाढवण्याचा प्रयत्न करतो. प्रगतिशील राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात अनेक तांत्रिक बदल घडून येत आहेत. काही वर्षांपूर्वी आपण लँडलाईन फोनचा वापर करायचो, आता काळ एवढा पुढे गेला आहे की प्रत्येकाच्या हातात एक स्मार्टफोन तरी नक्कीच पाहायला मिळतो. तुम्हाला माहित आहे का गेल्या नऊ वर्षांमध्ये आपल्या देशात स्मार्टफोनचे उत्पादन तब्बल 20 पटींनी वाढले आहे. आनंदाची बातमी म्हणजे विक्री होणारे 99.2% स्मार्टफोन हे मेड इन इंडिया म्हणजेच भारतात बनलेले आहेत.

मेड इन इंडिया स्मार्टफोनची विक्री वाढली: (Smartphones In India)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशात स्मार्टफोनची विक्री वाढली आहे, बाजारात एकूण 99.2 टक्के विक्री झालेले स्मार्टफोन हे भारतात बनवले गेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी सदर माहिती देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. ते म्हणतात की जास्तीत जास्त प्रमाणात स्मार्टफोन देशात बनल्यामुळे इतर देशांमधून मोबाईल फोनची आयात करण्याचे प्रमाण आता बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. वर्ष 2014 पर्यंत आपण इतर देशांवर स्मार्टफोनच्या आयातीसाठी 78% अवलंबून होतो, आठ वर्षांनंतर आता 99.2% स्मार्टफोन हे आपल्या देशात बनवले जात‌ आहेत.

आकडे नेमकं काय सांगतात?

चाललेल्या विविध रिसर्चच्या आधारे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात 4.3 कोटी स्मार्टफोनची विक्री झाली (Smartphones In India). ज्यात Samsung या कंपनीला अव्वल स्थानावर पाहायला मिळते, कंपनीने बाजारात एकूण 79 लाख स्मार्टफोनची विक्री केलेली आहे.Samsung च्या मागोमाग Xiaomi या कंपनीने आपले स्थान बळकट करून ठेवले आहे. शेअर्सच्या आधारे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या कंपनीने एकूण 76 लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. तसेच 72 लाख स्मार्टफोनच्या विक्री सह Vivo हा तिसऱ्या स्थानावर असून RealMe ने आत्तापर्यंत 58 लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे, शेअर्सच्या आधारे Oppo या कंपनीने 44 लाख विक्री केलेली असून ते पाचव्या स्थानी कायम आहेत.